महाराष्ट्र ग्रामीण
जेएसडब्ल्यूच्या उच्चदाब वीज वाहिनीच्या विरोधात शेतकरी आक्रमक
सर्व शासकीय कार्यालयांत लवकरच धडक देण्याचा संघर्ष समितीचा इशारा

जेएसडब्ल्यूच्या उच्चदाब वीज वाहिनीच्या कोलेटीती विरोधात कोलेटीतील शेतकरी आक्रमक : खा. सुनील तटकरेंना दिले निवेदन
सर्व शासकीय कार्यालयांत लवकरच धडक देण्याचा संघर्ष समितीचा इशारा
महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई – नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्लू (जिंदाल स्टील वर्क) कंपनीत ४००/२२० के.व्ही. ही उच्च वीज दाब वाहिनी टाकण्याच्या कामात जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन व संबधित ठेकेदार कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे या उच्च वीज दाब वाहिनी विरोधात खारकोलेटी येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जनशक्ती संघर्ष समिती स्थापन केली असून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या विरोधात संघर्ष समितीने खा. सुनील तटकरे यांची भेट घेऊन त्यांना आपले निवेदन सादर केले. याप्रकरणी योग्य ती दखल घेतली जाईल असे आश्वासनही खा. सुनील तटकरे यांनी संघर्ष समितीला दिले आहे.
ज्या शेतक-यांच्या जागेतून ही उच्च दाबाची वीज वाहिनी जाणार आहे त्या जागेत संबंधित शेतकऱ्यांना भातशेती करता येणार नाही. जमिनीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे अशी जमीन भविष्यात कुणीही विकत घेणार नाही अथवा शेतकरी या जागेचा विकासही करु शकणार नाही. त्यामुळे शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत.
त्यामुळेच जेएसडब्ल्यू व ठेकेदार कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात कोलेटी, खारकोलेटी येथील या उच्च दाब वीज वाहिनीमुळे बाधित होणारे सुमारे २० संबंधीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांच्या या जनशक्ती संघर्ष समितीने नुकतीच खासदार सुनील तटकरे यांनी यांची नागोठण्यात राष्ट्रवादीचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानाजवळ भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते भाई टके, जनशक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी, उपाध्यक्ष हेमंत भोईर, सचिव मधुकर ठाकूर, संघर्ष समितीचे सदस्य चंद्रकांत ठाकूर जनार्दन भोईर तानाजी भोईर दयाराम पाटील आदींसह बाधित होणारे शेतकरी यावेळी उपस्थित होते.

जेएसडब्लू कंपनीच्या या ३० किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचे सर्वेक्षण करतांना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. या उच्चदाब वीज वाहिनीच्या खालील शेतजमीन तसेच वीज वाहिनीपासून दोन्ही बाजूकडील शेत जमीन मोठ्या प्रमाणात बाधित होऊन शेतक-यांचे नुकसान होणार आहे. या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम व वीज वाहिन्या टाकण्याचे काम जेएसडब्लू कंपनीने बी.एन.सी पॉवर प्रोजेक्ट लि. या दुस-या एका खासगी कंत्राटदार कंपनीला दिले आहे. असे असतांनाच ज्या शेतक-यांच्या शेतातून ही उच्चदाब वीजवाहिनी जाणार आहे त्या शेतक-यांना विश्वासात न घेतल्याने शेतक-यांत संतापाची लाट उसळली असून या प्रकाराला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जेएसडब्ल्यू कंपनी एकीकडे पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी एकरी करोडो रुपये किमतीने विकत घेत असतानाच दुसरीकडे आम्हाला कोणतीही नोटीस व सूचना न देता आमच्या संमतीशिवाय उच्च दाबाच्या विज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने एकतर आमची जमीन शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्या नुसार त्या दराने सरसकट संपादित करावी अथवा बाधित शेतकऱ्यांच्या एक वारसाला कंपनीत नोकरी द्यावी अशी मागणीही बाधित शेतक-यांमधून होत आहे.