अपघातमहाराष्ट्र ग्रामीण

वीज वाहिन्यांवर झाड कोसळून अपघात घडण्याची वीज वितरणचे अधिकारी वाट पाहत आहेत काय ?  

प्रभू आळीतील तो महाकाय वृक्ष धोकादायक 

प्रभू आळीतील तो महाकाय वृक्ष धोकादायक 

वीज वाहिन्यांवर झाड कोसळून अपघात घडण्याची वीज वितरणचे अधिकारी वाट पाहत आहेत काय ?  
झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरणचे कर्मचारी उदासीन 
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागोठण्यात संताप 
महेश पवार 
नागोठणे : नागोठण्यातील गजबजलेल्या प्रभू आळीतील रहदारीच्या मार्गावरील एक महाकाय वृक्ष धोकादायक अवस्थेत आहे. रहदारीच्या मार्गालगत असलेल्या या महाकाय वृक्षाच्या खालूनच वीज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा गेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील वादळ वाऱ्यात या वीजवाहक तारांवर हा वृक्ष कोसळून एखादा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. असे असतांनाही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरणचे नागोठण्यातील अधिकारी व कर्मचारी एखाद्या अपघाताची वाट पाहत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करून या प्रकाराबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 
वीज वितरण कंपनी कडून वीज दुरुस्तीची कामे करण्यासाठी नागोठण्यात दरवर्षी उन्हाळ्यात वारंवार शट डाऊन घेण्यात येते. यावर्षीही अनेकवेळा शट डाऊन घेण्यात येवूनही नागोठण्यात सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या शट डाऊन मध्ये वीज वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम प्रामुख्याने करण्यात येत असते.  मात्र असे असतांनाही नागोठण्यातील काही भागांतील झाडांच्या फांद्या अद्याप तोडण्यात आले नसल्याचे प्रभू आळीतील झाडामुळे दिसून आले आहे. त्यामुळे एखादा अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी येथे तातडीची उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागोठण्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन भडका होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याने याप्रकरणी येथील प्रभारी पोलिस अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी  लक्ष घालावे अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी यांनी समाज माध्यमांवर केली आहे. 
दरम्यान यासंदर्भात वीज वितरणचे नागोठण्यातील सहाय्यक अभियंता नितीन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता प्रभू आळीतील महाकाय वृक्ष पाहता वीज वाहिन्यांजवळच्या फांद्या तोडण्याचे काम काळजीपूर्वक करण्याची गरज असून त्यासाठी लवकरच आवश्यक ती उपाययोजना करण्यात येईल. तसेच विजेतील तांत्रिक बिघाड हे कधीही सांगून येत नसतात. जेव्हा तांत्रिक बिघाड होतात तेव्हा त्याचा तपास करून ते दोष दूर करण्याचे काम करण्यात येते. सध्या पावसाळा असल्याने वीज वाहिन्यांवर बसणाऱ्या कावळ्यांमुळे शॉर्ट सर्किट होवून वा इतर अनेक कारणांनी वाहिनी ट्रीप होवून वीजपुरवठा वारंवार बंद होतो. त्यामुळे वीजवाहिन्यांत कधीही कुठेही बिघाड झाल्यास आम्ही त्याचा तपास करून त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र नागोठणे विभागातील वीजवाहिनीचे अंतर खूप मोठे असल्याने तांत्रिक बिघाड सापडण्यास कधी कधी उशीर झाला तर वीजपुरवठा पूर्ववत करण्यासही उशीर होतो असेही नितीन जोशी यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!