आता मटका, जुगार वाल्यांची खैर नाही !
अवैध धंदे बंद म्हणजे बंदच !!

आता मटका, जुगार वाल्यांची खैर नाही !
अवैध धंदे बंद म्हणजे बंदच !!
पोलिस अधिक्षक आंचल दलाल कडाडल्या
पत्रकार परिषदेत अवैध धंदे वाल्यांना तंबी
छुप्या अवैध धंद्यांची माहिती देण्याचे पत्रकारांना आवाहन
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार
महेश पवार
नागोठणे : रायगड जिल्ह्याला आंचल दलाल यांच्या रूपाने प्रथमच महिला पोलीस अधिक्षक लाभल्या आहेत. लेडी सिंघम म्हणून त्यांची रायगड जिल्ह्यात दमदार एन्ट्री झाली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आणि आठ दिवस आढावा घेतल्यानंतर नव्या जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आपली दबंग कामगिरी सुरू करून मटका, जुगार तसेच इतर बेकायदा धंद्ये वाल्यांची खैर नाही, असा थेट इशारा देत अवैध धंदे वाल्यांना तंबी दिली आहे. तसेच छुप्या पद्धतीनेही कुठे अवैध धंदे सुरू असतील तर पत्रकारांनी त्याची माहिती द्यावी असेही त्यांनी सांगितले आहे. सोमवारी (दि.२) आंचल दलाल यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी कारवाईची दिशा स्पष्ट केली. त्याचवेळी महिलांच्या सुरक्षेला संपूर्ण प्राधान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात विशेष करून रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये तसेच जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये मटका, जुगार व इतर अनेक अवैध धंदे बेधडक सुरू असल्याचे माध्यमांनी यापूर्वी अनेकदा वर्तमान पत्रांतून तसेच इतर माध्यमांतून वेळोवेळी निदर्शनास आणले आहे. त्या त्या वेळी या अवैध धंद्यांवर कारवाई व्हायची. मात्र त्यानंतर पुन्हा “जैसे थे” ही परिस्थिती असायची. मात्र, आता तात्पुरती नाही तर कायमची कारवाई होणार, असे स्पष्ट करून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रायगड जिल्ह्यातील जुगार, मटका, गुटखा, ऑनलाइन गेम, चक्री जुगार यांना लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. एवढेच नाही तर तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी रायगड जिल्ह्यातील बेकायदा धंदे बंद करण्याचे आदेश रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याची माहिती आंचल दलाल यांना मिळाली तर तेथील प्रभारी अधिकाऱ्यांचेही काही खरे नाही असेही बोलले जात आहे.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंदच ठेवणार !
जिल्ह्यात यापूर्वी सुरू असलेले सर्व अवैध धंदे हे बेकायदेशीरच आहेत. ते अवैध धंदे सुरू राहणार नाहीत हेच माझे धोरण राहणार आहे. जिल्ह्यात जे बेकायदेशीर आहे ते आम्ही चालू देणार नाहीत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांसह इतर जे काही प्रश्न आहेत त्यांना मुळापासून समजून घेण्यासाठी मी एक महिना घेणे पसंद करेन. त्यानंतर आमच्याकडे उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करायचा हे पाहिले जाईल. जिल्ह्यात ज्या काही बेकायदेशीर घडामोडी घडत आहेत त्या कायमच्या बंद करण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही आंचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात सहाय्यक अधीक्षक पदावर असताना आंचल दलाल यांनी मटका व जुगार विरोधात धडाकेबाज कारवाई केली असल्याने रायगड मधील अवैध धंदेवाल्यांचा त्या कायमचा बंदोबस्त करण्यात नक्कीच यशस्वी ठरतील असे माध्यमांतून बोलले जात आहे.
डिझेल तस्करी संपविणार
डिझेल तस्करीसाठी रायगडची किनारपट्टी बदनाम होत आहे. म्हणूनच डिझेल तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठ सागरी पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून सागरी सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिवाय तटरक्षक दलाची मदत घेतली जाईल, असेही आंचल दलाल सांगितले.
महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार !
आंचल दलाल यांनी २२ मे रोजी रायगडच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी घेतल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथकाला बळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. १५ जूनपासून शाळा-कॉलेज सुरू होतील. त्यावेळी छेडछाडीच्या घटना घडू नयेत म्हणून दामिनी पथके पुन्हा जोरात कामाला लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील महामार्ग वाहतूक कोंडीचे हब बनले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव जवळ कायम वाहतूक कोंडी होते. जिल्ह्यातील महामार्गावरील वाहतूक कोंडी निकाली काढण्यावर भर देणार असल्याचेही आंचल दलाल यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक दिनासाठी सुरक्षा
दरम्यान, ६ जून रोजी किल्ले रायगडावर तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी ३ लाखांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर येणार आहेत. सध्या रायगड पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण तयार आहे. यावेळी दीड हजाराहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी सज्ज असतील, असे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले. रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या मार्गावर वाहतूक पोलीस सज्ज असतील. पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. तसेच वाहतूक कोंडीची झळ बसू नये यासाठी रायगड पोलिसांनी तयारी केली आहे. याशिवाय सीआरपीएफ, शीघ्र कृती दल आणि सुरक्षेत त्रुटी राहू नये म्हणून लगतच्या जिल्ह्यातून पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे आंचल दलाल यांनी सांगितले.