अपघातपूरमहाराष्ट्र ग्रामीणवाहतूक

नागोठणे – वरवठणे ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद : नागरिकांचे हाल

किमान पादचारी व मोटरसायकलसाठी मार्ग ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी 

नागोठणे – वरवठणे ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद : नागरिकांचे हाल

किमान पादचारी व मोटरसायकलसाठी मार्ग ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी 
पुलाच्या कठड्याच्या दुरुस्तीचे काम सुरू 
खा. धैर्यशीलदादा पाटील यांना निवेदन 
महेश पवार
नागोठणे : नागोठणे व वरवठणे गावांना जोडणाऱ्या तसेच अनेक गावे व आदिवासी वाड्या यांना येण्याजाण्यासाठी महत्वाचा दुवा असलेला  नागोठणे – वरवठणे हा मुगल कालीन ऐतिहासिक पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे. पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडूनही यासंदर्भात सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वरवठणेसह परिसरातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे हा पूल किमान पादचारी व मोटारसायकलस्वार जातील एवढी जागा सोडून त्यांच्यासाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नागोठणे येथील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६, प्राथमिक आरोग्य केंद्र ते नागोठणे फाटा – एस.टी. स्थानक मार्गे वरवठणे या रस्त्यावर असलेला मुगल  कालीन पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर पुलावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. या संदर्भात महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड्स आणि सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
सदर रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांसाठी वरवठणे–आंबेघर फाटा–रिलायन्स चौक–नागोठणे हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मात्र वरवठणे गावाहून नोकरी व्यवसायानिमित्त, नागोठण्यात खरेदीसाठी दररोज ये जा करणाऱ्या पादचारी व नागरिकांसाठी हा खूप मोठा वळसा असून त्यांना ३ ते ४ किलोमीटर पायी चालत जावे – यावे लागणार आहे.
सद्यस्थितीत येथील अंबा नदीला नुकत्याच आलेल्या  पुराच्या जोरदार प्रवाहामुळे या पुलाच्या पडझड झालेल्या कठड्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने हा कठडा बांधून होताच किमान पादचारी व मोटारसायकल जाईल एवढी जागा सोडावी अशी जोरदार मागणी वरवठणे मधील ग्रामस्थांनी व दुचाकी वाहनचालकांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान यासंदर्भात वरवठणे ग्रामस्थांनी खा. धैर्यशीलदादा पाटील यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना आपले गाऱ्हाणे सांगितले आहे. खा. धैर्यशीलदादा पाटील यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामस्थांना आश्वासीत केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!