महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक

नागोठण्यातील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद

नागरिकांचा जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास सुरूच 

नागोठण्यातील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद

नागरिकांचा जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास सुरूच 

नवीन पुलासाठी शासन उदासीन 

वरवठणे मधील नागरिक, विद्यार्थ्यांना घ्यावा  लागणार चार किलोमीटरचा हेलपटा 

महेश पवार 

नागोठणे : नागोठण्याहुन वरवठणे, रोहाकडे जाण्यासाठी  महत्वाचा असलेल्या अंबा नदीवरील नागोठणे-वरवठणे येथील ऐतिहासिक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांकडून नागोठण्यातील या ऐतिहासिक पुलावरून होणारी वाहतूक सोमवारी (दि.१६) बंद करण्यात आली आहे. तर पादचाऱ्यांनाही या पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी ४–५ किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी वरवठणे गावातील काही नागरिक व मोटारसायकलस्वार जीव मुठीत घेऊन या पुलावरूनच ये–जा करीत असल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.

रायगड जिल्ह्यातील नागोठणे – वरवठणे गावांना जोडणारा येथील अंबा नदीवरील हा ऐतिहासिक पूल हा सुमारे ४५०  वर्षापूर्वीचा असून रोहाकडे जाण्यासाठी तसेच परिसरातील वांगणी, आमडोशी या गावांसह इतर गावे तसेच अनेक आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हाच महत्वाचा पूल आहे. या पुलावरून गेली अनेक वर्षांपासून एस टी. व इतर अवजड वाहतून सुरू होती. भारत सरकारचा उपक्रम असलेला आयपीसील(आता रिलायन्स) कंपनीच्या उभारणीच्या काळात नगोठण्यात अंबा नदीवर पर्यायी पुल उभारल्यानंतर १९९५ च्या सुमारास या ऐतिहासिक पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली.

या ऐतिहासिक पुलाला अंबा नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरांसह १९८९, २००५ साली व त्यापूर्वी आलेल्या अनेक महापुराचेही फटके बसले आहेत. त्यामुळे या पुलाची खुप वाईट अवस्था झाली आहे. असे असतांनाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे रोहा विभागाने या पुलाच्या दुरुस्तीकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. सद्य स्थितीत या पुलाच्या पायथ्याशी असलेले दगड,  कठडे व बांधकामातील दगड निघून पूल खिळखिळा झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत.  या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याची गरज असताना शासनाने याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून नवीन पुलाचा प्रस्ताव तयार न करता हा पूल नागरिकांसाठी बंद करून त्यांना वेलशेत फाटा मार्गे ४ ते ५ किलोमीटरचा हेलपाटा मारण्यास लावणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या कृती बद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

या पुलाच्या डागडुजीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने जाणून बुजून दुर्लक्ष केल्यानेच तसेच पुलाच्या कठड्यावर भली मोठी इंटरनेट केबल टाकण्यात आल्याने गेल्या वर्षी अंबा नदीला आलेल्या पुरात पुलाचा वरवठणे गावाकडे जाताना उजव्या बाजूकडील कठडा दोन ठिकाणी उद्ध्वस्त झाला होता.  हा शिवकालीन पूल आता मोडकळीस आला आहे.  भविष्यात अचानक हा पूल कोसळला तर जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतातरी शासनाचे डोळे उघडतील का ? की सावित्री नदीवरील पूल, इंद्रायणी नदीवरील पूल जसे कोसळले व निष्पाप जीवांचा जसा नाहक बळी गेला तसे बळी गेल्यानंतरच येथे नवीन पूल बांधला जाईल का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. पूल ४५० वर्षे जुना असल्याने तो नागरिकांना रहदारीसाठी बंद करणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले उदासीन धोरण सोडून तातडीने या ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव तयार करून पुलाचे काम सुरू करण्याची नितांत गरज आता निर्माण झाली आहे.

नागोठणे – वरवठणेला जोडणाऱ्या सुमारे ४५० वर्षाच्या या ऐतिहासिक पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. नवीन पुलासाठी शासन दरबारी अनेक वर्षे मी पाठपुरावा करूनही दाद देण्यात आली नाही.  संबंधित अधिकारी व शासनकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळेच पुलाची दयनिय अवस्था झालेली असून नागरिक या पुलावरून रहदारी करत असताना जर हा पूल पडला तर त्यावेळी काय घडेल याची कल्पना न केलेली बरी. दुर्भाग्याने असे घडले तर त्याची सर्वस्वी  जबाबदारी शासनाची असेल  – किशोरभाई म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, वरवठणे, ता.रोहा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!