महाराष्ट्र ग्रामीण

रिलायन्स कंपनीच्या नागोठण्यातील कामगारांना भरघोस पगारवाढ देणारा करार 

थकबाकीच्या स्वरूपात कामगारांना लाखोंची लॉटरी

रिलायन्स कंपनीच्या नागोठण्यातील कामगारांना भरघोस पगारवाढ देणारा करार

थकबाकीच्या स्वरूपात कामगारांना लाखोंची लॉटरी
कामगार वर्गात फक्त “खुशी” अजिबात नाही “गम”
कामगारांचे पगार होणार ७० हजार ते सव्वा लाखांच्या वर
आत्तापर्यंतचा सर्वोत्तम करार असल्याचा कामगार संघटना फोरमचा दावा
महेश पवार
नागोठणे : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन मध्ये कार्यरत असलेल्या कामगारांस पुन्हा एकदा भरघोस  पगारवाढ मिळविण्यात कामगार संघटना फोरम यशस्वी झाली आहे. रिलायन्सच्या येथील कामगारांना सिटीसी प्रमाणे सरासरी १६ हजार ५०० एवढी भरघोस पगारवाढ झाली आहे. या करारामुळे वेगवेगळ्या श्रेणीतील कामगारांचे मासिक वेतन रुपये ७० हजार ते सव्वा लाख रुपयांच्या वर होणार आहेत. तर या करारामुळे थकबाकीच्या स्वरूपात कामगारांना लाखोंची लॉटरी लागली असून अडीच ते तीन लाखांच्या वरील रकमेची थकबाकी कामगारांच्या खात्यात जमा झाली आहे. या कराराची माहिती कामगार संघटना फोरमने बुधवारी (दि.४) रिलायन्सच्या निवासी संकुलातील सभागृहात पत्रकार परिषदेत दिली.
रिलायन्स कंपनीतील आत्तापर्यंतचा हा सर्वोत्तम पगार वाढीचा करार असल्याचा दावा भारतीय श्रमिक शक्ती संघ, पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन (इंटक), महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना, श्रमिक सेना, पेट्रोकेमिकल एम्प्लॉईज युनियन, कोकण श्रमिक संघ, भारतीय कामगार सेना या सात कामगार संघटनांच्या फोरमने केला असून या करारामुळे कामगार वर्गात फक्त आणि फक्त “खुशी” अजिबात नाही “गम” असे वातावरण आहे. साडेपाच वर्षांसाठी असलेल्या या कराराची मुदत १ डिसेंबर, २०२३ ते ३१ मे, २०२९ राहणार आहे. या कराराच्या दरम्यान निवृत्त झालेल्या कामगारांनाही या कराराचा काही प्रमाणात फायदा होणार असल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे.
२१ मे, २०२५ रोजी रिलायन्स कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना फोरमच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटना प्रतिनिधी यांनी वेतनवाढ करारावर सह्या केल्या आहेत. यावेळी  रिलायन्स कंपनीच्या वतीने ग्रुप प्रेसिडेन्ट अविनाश  श्रीखंडे, प्रेसिडेन्ट शशांक गोयल, इंडस्ट्रिअल रिलेशन प्रमुख चेतन वालंज, एच आर प्रमुख गौतम मुखर्जी,  निलेश दांडेकर व श्रीकांत गोडबोले यांनी प्रतिनिधीत्व केले. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कामगार संघटना व कामगार वर्गाकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. कामगार संघटनांच्या वतीने संजय काकडे, विकास खांडेकर, लक्ष्मण खाडे, जनार्दन शेळके, अशोक भोय, नंदकुमार कोळी, अरुण कुथे, विश्वनाथ उतेकर, सतीश जवके,  प्रमोद मोरे,  मिलिंद मांढरे, रशीद दापोलकर, राजेंद्र लवटे व सुहास कुथे या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी प्रतिनिधित्व केले. तर हा वेतनवाढ करार यशस्वी होण्यासाठी कामगार नेते साधुरामदादा मालुसरे, दिपकभाई रानवडे व विकासभाई चवरकर यांनी विशेष लक्ष केंद्रित करून आपापले पदाधिकारी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून सदर वेतनवाढ करार यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले.
सन १९८९ पासून कार्यान्वित झालेल्या या प्रकल्पामध्ये कार्यरत असणारे कामगार यांना प्रत्येक वेतनवाढ कराराच्या रूपाने सुरुवातीपासूनच भरीव पगारवाढ, बोनस, अतिउत्तम वैद्यकीय सुविधा, मुलांना मोफत शिक्षण व अन्य विविध प्रकारच्या सेवाशर्ती – सवलती मिळवून देण्यात कामगार संघटना यशस्वी झाल्या आहेत.
सन २०२०-२०२१ मध्ये कोरोना सारख्या महामारीमुळे संपूर्ण जगतील जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील कामगार संघटना फोरमने कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करून दि. ११ जानेवारी, २०२१ रोजी वेतनवाढ करार करून कामगारांना उत्तम पगारवाढ, महागाई भत्ता स्कीम, बोनस व अन्य सेवाशर्ती –  सवलती मिळवून देण्यात कामगार संघटना फोरम यशस्वी झाली होती. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन फोरमने  सविस्तर माहिती दिली होती.
मागील वेतनवाढ करार ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी संपुष्टात आला होता. कामगार संघटना फोरमच्या वतीने चार्टड डिमांड्स कंपनीकडे सादर करून फोरमच्या वतीने मागण्यांबाबत कंपनी व्यवस्थानाकडे पाठपुरावा करून यशस्वीपणे बोलणी करण्यात आली. अखेर २१ मे, २०२५ रोजी रिलायन्स कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना फोरमच्या वतीने कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कामगार संघटना प्रतिनिधी यांनी वेतनवाढ करारावर  सह्या  करून प्रतीक्षेत असणारे कर्मचारी यांस भरीव पगारवाढ, अति उत्तम महागाई भत्ता (व्ही.डी. ए) स्कीम, बोनस, मुळ वेतनामध्ये प्रत्येक वर्षी भरीव वाढ, सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा, मुलांना मोफत शिक्षण इत्यादी आर्थिक फायदे, सेवाशर्ती व सवलती कराराच्या रूपाने मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे रिलायन्स कंपनी मधील कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील ३६ वर्षांच्या कालखंडामध्ये ज्यांचे नेतृत्व व मार्गदर्शन लाभले असे लोकप्रिय कामगार नेते, महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ मंत्री, श्रमिक सेनेचे संस्थापक ना. गणेश नाईक यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी ज्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असे रायगडचे विद्यमान खासदार सुनिल तटकरे, भारतीय कामगार सेना अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, श्रमिक सेनेचे अध्यक्ष व माजी खासदार संजीव नाईक, राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा पाटील, राज्याचे मंत्री ना. नितेश राणे, आमदार महेंद्रशेठ दळवी, कामगार नेते ॲड. नितीन  शिवकर, के. एस. दस्तूर या सर्व नेत्यांचे कामगार संघटना फोरमने यावेळी आभार मानले. दरम्यान दि. २१ मे रोजी झालेल्या सभेमध्ये सर्व कर्मचारी यांचेकडून कामगार संघटना फोरमचे वरिष्ठ पदाधिकारी व मार्गदर्शक कामगार नेते यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक चंद्रकांत अडसुळे यांनी केले. 

वेतनवाढ कराराची ठळक वैशिष्ट्ये
– डिसेंबर २०२३ रोजी कामगारांचे सरासरी मूळ वेतन  रुपये. ४६००० च्या वर झाले आहे.
– ⁠प्रत्येक वर्षी मुळ वेतनामध्ये २.९ % दराने प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये वार्षिक वाढ मिळणार आहे
– ⁠ऑल इंडिया  कंझुमर प्राईज इन्डेक्स (AICPI) प्रमाणे प्रत्येक तीन महिन्याला बदलणारा महागाई भत्ता मिळणेकरिता स्वतंत्र स्किम.
– ⁠सरासरी पगारवाढ रुपये १६५००/- (CTC )
– सरासरी पगारवाढीच्या रूपाने मिळालेल्या मूळ रकमे मधून अंदाजे रुपये १३००० ( सरासरी ) कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वर्ग करण्यात आले (म्हणजेच जवळ जवळ ७० % रक्कम मूळ पगारात समाविष्ठ )
– ⁠कराराचा कालावधी पाच वर्ष सहा महिने
– प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या बोनसमध्ये ३ हजारांची वाढ होऊन मिळणार रुपये ६४ हजार बोनस.
– ⁠कामगार तसेच कामगारांवर अवलंबित कुटुंबीयांकरिता (डिपेन्डन्ट फॅमिली) अमर्यादित वैज्ञाकीय ऊपचार योजना.
– ⁠कामगारांच्या मुलांना इयत्ता १२ वी पर्यंत मोफत शिक्षण.
– ⁠याव्यतिरिक्त मागील करारांच्या तरतुदीनुसार मिळणाऱ्या सर्व सेवाशर्ती व सवलती कायम राखण्यात कामगार संघटना फोरमला यश मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!