अपघातमहाराष्ट्र ग्रामीणवाहतूक
रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ नागोठणेकरांवर आणून देऊ नका
शिवसेना नेते किशोर जैन यांचा शासनाला गर्भित इशारा

रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ नागोठणेकरांवर आणून देऊ नका
शिवसेना नेते किशोर जैन यांचा शासनाला गर्भित इशारा
नागोठण्यातील पूर परिस्थिती, महामार्गाची दयनीय अवस्था व विजेचा खेळखंडोबा यावर पत्रकार परिषदेत वेधले लक्ष
महेश पवार
नागोठणे : पूरग्रस्त नागोठण्याकडे येथील अनेक बाबतीत शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. मुंबई गोवा चौपदरीकरणाच्या कामातही अनेक त्रुटी ठेवल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास नागोठणेकरांना होत आहे. तसेच शहर व ग्रामीण भागात विजेच्या खेळखंडोब्यामुळे वीज वितरणाच्या बाबतीत येथील नागरिक तर कमालीचे वैतागले आहेत. त्यामुळे या सर्वच बाबतीत संबंधितांनी लवकरात उपाययोजना करा. रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ नागोठणेकरांवर आणून देऊ नका असा गर्भित इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी नागोठणे ग्रामपंचायतीच्या कै. शैलेंद्र देशपांडे सभागृहात शुक्रवारी(दि.२०) घेतलेल्या पत्रकार परिषदेत शासनाला दिला आहे.

शिवसेना नेते किशोरभाई जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेला नागोठण्याच्या सरपंच सुप्रिया महाडिक, नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, उपसरपंच अकलाख पानसरे, शिवसेना विभाग प्रमुख संजय भोसले, शाखाप्रमुख धनंजय जगताप, संजय काकडे, अनिल महाडिक, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सतीश ठोंबरे, ऍड. प्रकाश कांबळे, शबाना मुल्ला, पुनम काळे, भाविका गिजे, अमृता महाडिक, शहनाज अधिकारी, मजित लंबाते, भरत गिजे, जितेंद्र जाधव, सतिश पाटील, संदिप राऊत, जोएब कुरेशी, किशोर नावले आदी मान्यवर उपस्थित होते.

किशोर जैन यांनी सांगितले की,
नागोठण्यातील अंबा नदी मोठ्या प्रमाणात गाळाने भरली असल्याने थोडा जरी पाऊस पडला नागोठण्यात पूर परिस्थिती निर्माण होते. पुराच्या बाबतीत नागोठणे हिट लिस्टवर असूनही १९८९ च्या महापुरानंतर शासनाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदावरचे खेळ चालविले आहेत. नागोठणे परिसरातील अंबा नदीतील गाळ काढण्याबरोबरच दरवर्षी येणारे छोटे पूर टाळण्यासाठी दोन्ही बाजूला रोहा येथील कुंडलिका नदी किनारी केल्याप्रमाणे संरक्षण भिंतीची नितांत गरज असताना व त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज असताना केवळ १ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून शासनाने नागोठणेकरांची थट्टा चालविली आहे. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे येथील कोळीवाडा, बंगले आळी, मोहल्ल्यातील काही भागातील नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पूर येणाऱ्या भागातील नागरिकांना पुराच्या वेळी निवाऱ्यासाठी एक प्रशस्त सभागृह असावा ही आमची अनेक वर्षांपासूनची मागणी असून त्यासाठी जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाची जागाही सुचविली असून तसा पत्रव्यवहारही करण्यात येऊनही त्यासाठी निधीची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे महाड व चिपळूण येथे शासनाने लक्ष दिले त्याप्रमाणेच मध्यवर्ती असूनही नागोठण्यावर दुर्लक्ष केल्याने किशोर जैन यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात बोलताना किशोर जैन म्हणाले की, नागोठणे भागातील महामार्गाचा आराखडा तयार करतांना नागोठणेकरांना विश्वासात घेतले नाही. महामार्गालगतच्या कामात मोऱ्या, नाले बंद झाल्याने डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रवाह बदलला असून मोठ्या प्रमाणातील हे पाणी नागोठण्यातील शांतीनगर, जोगेश्वरी नगर भागात तुंबत असून नागरिकांच्या घरात पाणी जात आहे. नागोठणे ग्रामपंचायतीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीला अनेक वेळा पत्रव्यवह करूनही ठेकेदाराने योग्य ती उपाययोजना न केल्याने महामार्गाच्या नियोजनशून्य कामामुळे अपघात होऊन माणसे मरत आहेत. अशाचप्रकारे वणी येथील अजय मांडलुस्कर या तरुणाचा एका अपघातात नाहक बळी गेला. त्यामुळे महामार्गाच्या कामाबद्दल किशोर जैन यांनी संताप व्यक्त करून संयमी नागोठणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाहीतर नागरिकांचा भडका उडेल असेही त्यांनी सांगितले.
वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यावर बोलतांना किशोर जैन म्हणाले की, वीज दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव दर तीन वर्षांनी करण्याची गरज असताना वीज वितरण कडून कोणतेही नियोजन केले जात नाही. त्यामुळे दररोज कुठे ना कुठे तरी वीज वाहिन्यांत, विजेचे खांब यामध्ये बिघाड होऊन नागरिकांना रात्र रात्रभर काळोखात रहावे लागते. नागोठण्यात पूर आल्यानंतर शहराचा अर्धा भाग पाण्यात असतो. त्यामुळेही वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. असे असूनही विद्युत जनित्र उंचावर बसविण्याचे काम केले जात नाही. आमच्यावर नागोठण्यातील जनतेने जो विश्वास दाखवून गावचा कारभार करण्याची आम्हाला एकहाती सत्ता दिली त्यासाठी लोकांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली असून यातून शासनाने वरिष्ठ पातळीवर बोध घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असा स्पष्ट इशाराही किशोर जैन यांनी शासनाला दिला आहे.