महाराष्ट्र ग्रामीणसाहित्यिक

साहित्यिक रमेश धनावडे लिखित ‘नादखुळा’ या पुस्तकाचे प्रकाशन

साहित्यिक रमेश धनावडे लिखित ‘नादखुळा’ या पुस्तकाचे प्रकाशन

अनिल पवार 

नागोठणे : सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण प्राप्त रमेश धनावडे यांनी लिहिलेल्या ‘नादखुळा’ या त्यांच्या सहाव्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.साहित्यसंपदा प्रकाशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित झाले असून साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी रमेश धनावडे यांच्या काही निवडक कवितांचे वाचन किरण साष्टे व ज्योती बावधनकर यांनी खुमासदार पद्धतीने केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी काही शुभेच्छापत्र आली होती त्याचे वाचन वैशाली भिडे यांनी खूप छान पद्धतीने केले.

या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ऍड. प्रसाद पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, डॉ.चंद्रकांत वाजे, डॉ. राजेंद्र चांदोरकर, सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल म्हात्रे, चित्रपट निर्माते दिग्दर्शक लेखक नरेंद्र ठाकूर, रायगड जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, साहित्यिक ऍड.विलास नाईक,साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे, पूनम रमेश धनावडे, महेश कवळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेचयावेळी उपस्थित मान्यवर पाहुण्यांची भाषणे झाली यात रमेश धनावडे यांच्या सामाजिक, साहित्यिक व इतर कार्याचा आढावा घेतला गेला. तसेच ते सातत्याने करत असलेल्या लिखाणाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले. प्रभाकर धनावडे यांनी या पुस्तकास शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपल्या मनोगतात रमेश धनावडे यांनी उपस्थितांना नादखुळा पुस्तकाचा प्रवास थोडक्यात सांगितला. तसेच या पुस्तकासाठी नादखुळा हेच नाव का कायम केले गेले याविषयीही माहिती दिली. तसेच त्यांनी या पुस्तकातील आपल्या काही निवडक कविता गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ आर्टिस्ट व चित्रकार निलेश जाधव यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केले आहे. तसेच या पुस्तकासाठी प्रस्तावना व ब्लफ ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांनी लिहिली आहे. पुस्तकाच्या अंतर्गत सजावटीचे काम योगेश राणे यांनी केले असून पुस्तकाचे मुद्रित शोधनाचे काम महेश कवळे यांनी खूप छान पद्धतीने केले आहे. साहित्यिक रमेश प्रभाकर धनावडे यांचे शिक्षण एम.कॉम., एल एल. बी., एम.बी.ए. असे झाले असून ते रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे डेप्युटी जनरल मॅनेजर एच. आर. (कॉर्पोरेट अफेअर्स) म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेखसंग्रह व असेच काहीतरी ही पुस्तके प्रकाशित आहेत.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कवळे यांनी अतिशय बहारदारपणे केले.तसेच या पुस्तकाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आहे. नादखुळा हे पुस्तक साहित्य क्षेत्रामध्ये भरपूर नावलौकिक मिळवेल असा विश्वास उपस्थित मान्यवर व साहित्य क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अपूर्वा धनावडे, तेजल धनावडे, पार्थ पाटील, राजेश्री पाटील व इतर अनेक जणांनी खूप मेहनत घेतली. यावेळी अलिबाग तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत साहित्यिक, सुजाण नागरिक, वाचक, साहित्यप्रेमी व रमेश धनावडे यांचा मित्रपरिवार आणि आप्तेष्ट उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!