महाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे परिसरात अवकाळी पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान
वीट व्यावसायिकांची आर्थिक मदतीची मागणी

नागोठणे परिसरात अवकाळी पावसामुळे वीटभट्ट्यांचे मोठे नुकसान
वीट व्यावसायिकांची आर्थिक मदतीची मागणी
महेश पवार
नागोठणे : नागोठणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्याचे रुपांतर शुक्रवारी (दि.४) सायंकाळी पावसाच्या शिडकाव्यात झाले. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाच्या सरी आल्यामुळे सर्व सामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांची व विटभट्टी व्यावसायिकांची देखील तारांबळ उडाली. या पावसामुळे वीटभट्टीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटा बनवण्यासाठी लागणारी माती वाहून गेली. त्याचप्रमाणे भट्टीत टाकलेल्या विटांचे देखील नुकसान झाले आहे.अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागोठणे विभागातील विटभट्ट्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त वीट भट्टींचे पंचनामे करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांत अवकाळी पाऊस पडला. यामध्ये नागोठणे परिसराचाही समावेश आहे. या पावसामुळे
शेतक-यांसह नागोठणे परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या वीट व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व वीट भट्टी व्यवसायिक मेटाकुटीला आले आहेत. वीट भट्टी व्यावसायिकांनी तयार करुन ठेवलेल्या कच्च्या विटांवर पडलेल्या पावसाने विटांची पूर्णतः माती झाली असल्याचे काही वीटभट्टी व्यावसायिकांनी सांगितले. काहींनी पाऊस पडायला सुरुवात होताच कच्च्या विटांवर तात्काळ ताडपत्री टाकण्यासाठी धडपड केली मात्र ताडपत्री घेऊन वीटभट्टीवर पोहचेपर्यंत उशिर झाल्याने कच्च्या विटांचे पावसामुळे नुकसान झाले. आधी कोरोनोचे संकट, नंतर चक्रीवादळ, त्यात वारंवार पडणारा हा अवकाळी पाऊस त्यामुळे रॉयल्टीच्या रूपाने शासनाची तिजोरी भरणारे वीट व्यावसायिक आज आर्थिक संकटात सापडले असून, डोक्यावर कर्ज घेऊन उभारलेला वीट व्यवसाय आज धोक्यात आला आहे. तरी शासनाने याची वेळीच दखल घेऊन या नुकसानग्रस्त वीट व्यावसायिकांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शासनाने नुकसानभरपाई जाहीर करावी – निखिल मढवीवीटभट्टीमध्ये काम करण्यासाठी इतर ठिकाणाहून कामगार आणले जातात. परंतु अवकाळी पावसाने नुकसान झाले तरी या कामगारांना पगार आणि रोजची हजेरी द्यावीच लागत असल्याचे खंत वीटभट्टी मालकांनी व्यक्त केली आहे. तसेच रॉयलटी भरुन सुध्दा शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. दरवर्षी अवकाळी पावसामुळे वीट भट्टी व्यवसायिकांना नुकसानीला सामोरे जावे लागते परंतु शासनाकडून कोणतीही मदत होत नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या वीटभट्टीचे पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. त्याचप्रमाणे आमच्या वीटभट्टीचे पंचनामे करून सरकारने आम्हाला देखील नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नागोठणे विभाग चालक मालक वीटभट्टी संघटना नागोठणेचे अध्यक्ष निखील बाळाराम मढवी यांनी केली आहे. याप्रकरणी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही निखिल मढवी यांनी सांगितले.