अपघातमहाराष्ट्र ग्रामीण
आंब्याच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपला नागोठण्यात अपघात
महामार्गाच्या कामात वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच

आंब्याच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपला नागोठण्यात अपघात
महामार्गाच्या कामात वाहनचालकांच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच
महेश पवार
नागोठणे : कोकणातून मुंबईकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जाणाऱ्या एका मालवाहक पिकअप जीपला (क्र. एम एच ४७ बी एल ५७६९) झालेल्या अपघातात पिकअप जीपचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. हा अपघात मंगळवार दिनांक ६ मे, रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार कल्याण टोल प्लाझा कंपनी व्यवस्थापनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने महामार्गावर वारंवार असे अपघात घडत असल्याचा आरोप वाहनचालक व स्थानिक नागरिकांतून करण्यात येत आहे.

या अपघातासंदर्भात उपलब्ध माहितीनुसार रत्नागिरीहून मुंबईकडे आंब्याच्या पेट्या घेऊन जात असलेली पिकअप जीप नागोठणे हद्दीतील रामनगर परिसरातील उड्डाण पुलाचे लगत असलेल्या सर्व्हिस रोडवरून मुंबई बाजूकडे जात होती. मात्र या पुलाचे भरावाचे काम सुरू असल्याने पुलालगतच्या सर्व्हिस रोडला लागूनच मोठ मोठे खड्डे तयार झाले असून सद्य स्थितीत हे खड्डे पाण्याने भरले आहेत. मात्र असे असूनही या सर्व्हिस रोडलगत महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार कल्याण टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांकडून धोकादायक जागेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या सूचना दर्शविणाऱ्या पट्ट्या वा सूचनफलक लावण्यात आलेले नसल्याने वाहनचालकांना येथील रस्त्याचा अंदाज येत नाही. अशाचप्रकारे अपघातग्रस्त पिकअप चालकाला या सर्व्हिस रोडचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून पिकअप जीप सर्व्हिस रोड लगत असलेल्या खोल खड्ड्यात गेली. सुदैवाने जीप मधील चालकासह सोबत असलेला एक लहान मुलगा व इतर प्रवासी जखमी झाले नाही. मात्र असे असले तरी ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे यापूर्वी नागोठणे हद्दीत अनेक अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा नाहक जीव गेला आहे. त्यामुळे आतातरी कल्याण टोल प्लाझाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळे उघडतील का ? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
पिकअप जीप तातडीने काढली खड्ड्यातून बाहेरआंब्याच्या पेट्या मुंबईला घेऊन जाणाऱ्या पिकअप जीपला पहाटे अपघात झाल्यानंतर हा अपघात झाला हे कुणाला समजू नये म्हणून कल्याण टोल प्लाझा चे कर्मचारी व संबंधित यंत्रणेकडून पिकअप जीपला खड्ड्यातून तातडीने बाहेर काढण्यात आल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे.