Uncategorized
नागोठणे परिसरात अवकाळी पावसामुळे लग्नमंडपांचे मोठे नुकसान
शेतकरी हतबल, व्यावसायिक धास्तावले

नागोठणे परिसरात अवकाळी पावसामुळे लग्नमंडपांचे मोठे नुकसान
शेतकरी हतबल, व्यावसायिक धास्तावले
दिनेश ठमके
सुकेळी : संपुर्ण रायगड जिल्ह्याला मंगळवारी(दि.६) अवकाळी पावसाने अक्षरशः
झोडपून काढले आहे. रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरामध्ये मंगळवार (दि.६) रोजी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. आकाशात पुर्णतः ढग भरुन आले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास नागोठणे परिसरामध्ये अचानक विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. सध्या सर्वत्र लग्नसराई सुरू असल्याने या अवकाळी पावसामुळे लग्न मंडपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाचा आंबा, काजू, बागायतदार शेतक-यांसह वीटभट्टी व्यावसायीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गुरांसाठी साठवुन ठेवण्यात आलेला चारा देखिल या पावसामध्ये भिजल्यामुळे गुरांची चा-याअभावी उपासमारी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी तयार झालेल्या आंब्यांवर अवकाळी पाऊस धडकल्यामुळे पीक खराब होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतक-याला पडली आहे.
सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी लग्न समारंभाची मोठ्या प्रमाणात धुम सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी लग्नमंडप उभारण्यात आले आहेत. परंतु या अचानक पडलेल्या पावसामुळे विवाह समारंभासाठी उभारलेले मंडप भिजल्याने मंडप वाल्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.