Uncategorized

नागोठण्यातील जोगेश्वरी नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे फाटकामुळे नागरिकांचे हाल

प्रवासी गाड्यांबरोबरच मालवाहक गाड्यांमुळे नागरिक त्रस्त

नागोठण्यातील जोगेश्वरी नगरकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे फाटकामुळे नागरिकांचे हाल

प्रवासी गाड्यांबरोबरच मालवाहक गाड्यांमुळे नागरिक त्रस्त

जीव धोक्यात घालून मालगाडी ओलांडून जात आहेत नागरिक

आजारी व्यक्तीला उपचारासाठी नेत असताना होत आहे खोळंबा

महेश पवार

नागोठणे : नागोठण्यातील १९८९ च्या महापुरातील पूरग्रस्तांची पुनर्वसित नवीन वसाहत असलेल्या जोगेश्वरी नगर (गावठाण) मधील नागरिकांसह वासगाव व इतर वाड्यांवरील नागरिकांना तसेच बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या एका वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. या नागरिकांना सध्या येथील जोगेश्वरी नगरच्या रेल्वे फटकामध्ये खूप वेळ थांबणाऱ्या मालगाड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. या मालगाड्यांमुळे आजारी व्यक्तीला नागोठण्यात उपचारासाठी नेताना तर चांगलाच खोळंबा होत असल्याने रेल्वे प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागोठणे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासह येथील नागरिकांनी केली आहे.

मध्य रेल्वेचे महत्वाचे मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे रेल्वे स्थानकाजवळच जोगेश्वरी नगर (गावठाण) चे हे रेल्वे फाटक आहे. नागोठण्याच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या या जोगेश्वरी नगरसह हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेले कोकण एज्युकेशन सोसायटीचे बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल असून पूर्वेकडील जंगल भागात वासगाव, पिंपळवाडी व लावेचीवाडी ही आदिवासी बांधवांची वस्ती असलेली गावे आहेत. त्यामुळे या भागातील पायी चालत जाणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना नागोठण्यात जाण्यासाठी पादचारी पूल असला तरी दुचाकी व चारचाकी तसेच प्रवासी वाहतूक करणारी मिनिडोर, मॅजिक या वाहनांना जोगेश्वरी नगरच्या रेल्वे फटकातूनच जावे लागत असून या वाहनांना दुसरा पर्याय नाही.

नागोठणे रेल्वे स्थानकापासून जोगेश्वरी नगरचे हे रेल्वे फाटक एकदम जवळच असल्याने या स्थानकातून मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या, प्रवासी गाड्या यामुळे वारंवार हे फाटक बंद करण्यात येत असते. तर काही वेळेला स्थानकावर एखादी प्रवासी गाडी उभी असेल तर या स्थानकातून न थांबता जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या येणार असल्याने तोपर्यंत हे रेल्वे फाटक बंदच ठेवण्यात येते.

लांब पल्ल्याच्या व इतर प्रवासी गाड्यांमुळे रेल्वे फाटक बंद करणे एकवेळ समजू शकतो पण काही वेळा नागोठणे रेल्वे स्थानकात विविध प्रकारचा अवजड माल घेऊन येणाऱ्या मालगाड्या माल खाली करतांना ट्रॅक बदलण्यासाठी जोगेश्वरी नगरच्या याच रेल्वे फाटकाच्या इथे येत असतात. यावेळी हे रेल्वे फाटक बंद करण्यात येत असते. यावेळी या मालगाडी खुप वेळ फाटकातील ट्रॅक वरच थांबत असल्याने येथून आपले वाहन घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांना खूप वेळ याठिकाणीच अडकून रहावे लागते. काही महत्वाचे काम असेल तर नागरिकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागतो. तर आजारी व्यक्तीला उपचारासाठी नागोठण्यात घेऊन जात असताना या बंद फाटकामुळे खोळंबून रहावे लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने उपायोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

” नागोठणे रेल्वे स्थानकातील मालगाड्या ज्या ठिकाणी अवजड माल उतरविण्यासाठी ट्रॅकवर  येतात त्या ठिकाणच्या रेल्वे यार्डचे काम सुरू आहे. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांतच नागोठणे रेल्वे स्थानकातील रेल्वे यार्डचे हे काम पूर्ण होणार असल्याने जोगेश्वरी नगरच्या फाटकात थांबणाऱ्या मालगाड्यांचा प्रश्न मार्गी लागेल असे रेल्वेच्या नागोठणे स्थानकातील स्टेशन व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!