महाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यातील रास्त भाव धान्य दुकानामध्ये निकृष्ठ दर्जाचे धान्य
धान्य कमी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार

नागोठण्यातील रास्त भाव धान्य दुकानामध्ये निकृष्ठ दर्जाचे धान्य
धान्य कमी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील रास्त भाव धान्य दुकान क्रमांक २ व ३ मध्ये वाटप सुरू असलेल्या तांदूळ व गव्हाचा दर्जा निकृष्ठ असल्याचे संबंधित रास्त भाव धान्य दुकानावर तांदूळ व गहू घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी व महिलांनी प्रस्तुत प्रतिनिधीच्या लक्षात आणून दिले आहे. तसेच या रास्त भाव धान्य दुकानात धान्य नियमापेक्षा कमी मिळत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे रोहा तहसील मधील पुरवठा अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे.

सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात अंत्योदय योजनेअंतर्गत पिवळे रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला तांदूळ २५ किलो व गहु १० किलो असे प्रति व्यक्ती ३५ किलो धान्य मिळत असते. तर प्राधान्य कुटुंब अंतर्गत केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबाला तांदूळ व गहूच्या स्वरूपात प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मिळत असते. असे असतांनाच नागोठणे शहरातील काही भागाचा समावेश असलेल्या तसेच वरवठणे व कडसुरे या गावांचा समावेश असलेल्या नागोठण्यातील या रास्त भाव दुकानावर पिवळ्या रेशन कार्ड धारकांना तांदूळ १५ किलो व गहू १० किलो असे एकूण २५ किलोच धान्य मिळत असल्याचे हे धान्य घेण्यासाठी आलेल्या पिवळे रेशन कार्ड धारक महिलांनी सांगितले. म्हणजेच १० किलो तांदूळ कमी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच या रास्त भाव धान्य दुकानात मिळणारे तांदूळ गुठळ्या आल्याचे तसेच गहू सुद्धा निकृष्ठ दर्जाचे असल्याचे महिलांनी दाखविले. यासंदर्भात संबंधित दुकान चालकाशी संपर्क साधला असता सरकारी गोदामातून आलेल्या धान्याचे आपण वाटप करीत असून माझ्याकडे ज्या प्रमाणात धान्य उपलब्ध झाले त्यानुसारच प्रति व्यक्ती हिशोबाने त्यानुसार किलोमध्ये धान्य आपण दिल्याचे स्पष्ट केले. तर यासंदर्भात रोहा तहसील मधील पुरवठा अधिकारी हेमलता कुरसुंगे यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी माहिती घेऊन संबंधित दुकानदारास योग्य त्या सूचना करून याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.