धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण

आपला देव, देश व धर्म ऐश्वर्यात राहायला पाहिजे ही धारणा असावी 

श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडीसिद्धेश्वर महाराज यांचे आमडोशी येथे प्रवचन 

आपला देव, देश व धर्म ऐश्वर्यात राहायला पाहिजे ही धारणा असावी 

श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडीसिद्धेश्वर महाराज यांचे आमडोशी येथे प्रवचन 
महेश पवार 
नागोठणे : या जगात भौतिक ऐश्वर्य कधीही पूजनीय नसून बुद्धीचे पूजन केले जाते. त्यामुळे ज्ञानाचे ऐश्वर्य खूप मोठे आहे. म्हणून बुद्धीला कधीही दरिद्री ठेवू नका. मनुष्याला अन्न, आहार खूप कमी लागते. साधेपणात जगायचे ठरविले तर मनुष्य खुप कमी खर्चात जीवन जगू शकतो. त्यामुळे स्वतःचे  जीवन साधेसुधे बनवून आपला देव, देश व धर्म ऐश्वर्यामध्ये राहायला पाहिजे ही धारणा प्रत्येकाची असावी असे बहुमोल मार्गदर्शन श्री क्षेत्र सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी (कोल्हापूर) येथील मठाधिपती श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी आपल्या प्रवचनात केले. 
नागोठण्याजवळील आमडोशी ( ता.रोहा) येथील सदानंदाश्रम मठात श्री. समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराज यांची २९ वी पुण्यतिथी व अखंड दासबोध सप्ताहाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक २७ ते गुरुवार दिनांक २९ मे दरम्यान आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने गुरुवारी (दि.२९) सकाळी श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांचे प्रवचन अत्यंत भक्तिमय वातावरणात तसेच गुरुबंधू, भगिनी व भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी सदानंदाश्रम मठाचे मठाधिपती गुरुवर्य, गुरुदास अनंत महाराज यांनीही मार्गदर्शन केले. या धार्मिक कार्यक्रमाला सेवेकरी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी संसारातील अनेक दाखले, उदाहरणे, गोष्टींसह भाविकांसमोर सादर करीत सुखी संसाराचे मार्ग कोणते ते सांगितले. तसेच मिळेल ते काम मग ते मोठे असो वा छोटे करीत राहायचे, येईल ते स्वीकारून चालत राहायचे, जेवढे दिवस जगतो त्यामध्ये हातात काम आणि मुखात नाम हवे. देव माझा, मी देवाचा हे तत्त्व स्वीकारून हे जगच माझे आहे ही अवस्था साधकाची असायला हवी अशी आमची नेहमी शिकवण असते. संसारात सर्वांनी खूप काही सोसलेले असते. आपल्याला जे मिळत आहे त्याचा खुशीने स्वीकार करा.  दिले आहे त्याच्यात समाधानी रहा,  क्षुल्लक गोष्टीवरून रडत बसू नका असे बहुमोल मार्गदर्शनही त्यांनी यावेळी केले.  
सदानंद मठातील श्री. समर्थ सद्गुरु ताईसाहेब महाराज यांची २९ वी पुण्यतिथी व अखंड दासबोध सप्ताहाचा कार्यक्रमाची सुरुवात मंगळवार दिनांक २७ मे रोजी सकाळी गुरुवर्य, गुरुदास अनंत महाराज यांच्या शुभहस्ते तसेच माऊलींची पाद्यपूजा, भजन, अखंड दासबोध नामसप्ताहाने करण्यात आली. तसेच या तीन दिवसांमध्ये गुरुदास अनंत महाराज (आमडोशी),  ह. भ. प. राजाभाऊ (आप्पा) पांचाळ( चिपळुण), गुरुभगिनी उषाताई कुलकर्णी (पुणे), चव्हाण महाराज (सोनसडे- चिपळुण), हनुमंत निंबाळकर महाराज (बिदाल- सातारा), लोकम गुरुजी( साडवली- देवरुख) यांचे प्रवचन संपन्न झाले.  गुरुवारी रात्री हरी जागरणाने या धार्मिक सोहळ्याचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सद्गुरु भजन मंडळ आणि ग्रामस्थ भक्त मंडळ आमडोशी, उनाठावाडी यांनी मेहनत घेतली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!